Tuesday, February 24, 2015

मी नास्तिक का आहे? -भगतसिंग part 2 of 6

पुढे मी क्रांतिकारी पक्ष्यात सामील झालो. सर्वात आधी मी ज्याच्या सानिध्यात आलो त्या आमच्या नेत्याची देवाबद्दलची पक्की खात्री नसली तरी तो देवाचे अस्तित्व नाकारण्याचे धैर्य दाखवू शकत नसे. माझ्या देवाविषयीच्या सततच्या चौकाशांवर तो म्हणत असे, 'जेव्हा इच्छा होईल तेव्हा प्रार्थना करत जा.' आता हे म्हणजे नास्तिकता उणे ते मत म्हणून अंगीकारण्यास लागणारे धैर्य होय. मी ज्याच्या सहवासात आलो तो दुसरा नेता कट्टर आस्तिक होता. त्याचा नामोल्लेख करायचा तर ते म्हणजे कराची कटासंबंधी आता जन्मठेपेची शिशा भोगत असलेले आदरणीय कॉ. सचिंद्रनाथ संन्याल. 'बंदिजीवन' या त्यांच्या सुप्रसिद्ध व एकमेव पुस्तकाच्या अगदी पहिल्या पानापासून देवाची थोरवी आवेशाने गायलेली आहे. त्या सुंदर पुस्तकाच्या दुसर्या भागाच्या शेवटच्या पानावर वेदांतनिष्ठेशी सुसंगत अशा स्तुतीसुमनांचा देवावर केलेला वर्षाव हा त्यांच्या गुढवादी विचारांचा एक सहज लक्ष्यात येण्याजोगा भाग आहे. २८ जानेवारी १९२५ रोजी हिंदुस्तानभर वाटली गेलेली 'क्रांतिकारी पुस्तिका' हीसुद्धा त्यांच्याच लेखणीतून उतरलेली आहे असे सरकारी बाजूचे म्हणणे आहे. आता गुप्त संघटनेच्या कामात नेहमी प्रमुख नेता आपली स्वतःचीच मते मांडतो व जवळच्या लोकांना  ती मान्य करावी लागतात.कार्यकर्त्यांचे त्याविषयी मतभेद असले तरी त्यांना नेत्याच्या मतांना मूकपणे संमती द्यावी लागते. त्या पुस्तिकेतील एक संपूर्ण परिच्छेद देवाची थोरवी, त्याची विश्वक्रीडा आणि अगाध लीला यांवर आहे. हे सर्व म्हणजे गुढवाद आहे. एकूण सांगायचे तर क्रांतिकारी पक्षात ईश्वराचा अविश्वास ही कल्पना मुळीच रुजलेली नव्हती हेच मला दाखवायचे होते.

चारही सुप्रसिद्ध काकोरी क्रांतिवीरांनी त्यांचा शेवटचा दिवस इस्वराच्या प्रार्थनेत घालवला. राम प्रसाद बिस्मिल हा सनातनी आर्यसमाजी होता. समाजवाद आणि साम्यवादाच्या क्षेत्रात खूप अभ्यास असूनही राजन लाहिरी हा उपनिषधे व गीतेतील स्तोत्रे पाठन करण्याची आपली इच्छा आवरु शकला नाही. यांच्यातला एकच मनुष्य मी पहिला आहे कि ज्याने कधीही प्रार्थना केली नाही आणि तो म्हणत असे, 'तत्वज्ञान ही माणसातला दुबळेपणा व त्याच्या ज्ञानाची मर्यादा यांची निष्पत्ती आहे.' हा माणूससुद्धा अआज जन्मठेपेची शिक्ष भोगत आहे. परंतु तोसुद्धा देवाचे अस्तित्व नाकारण्याचे धैर्य दाखवू शकला नाही.  

तोपर्यंत मी फक्त एक स्वप्नाळू आदर्शवादी क्रांतिकारक होतो. त्या वेळेपावतो आम्ही फक्त अनुयायी होतो. सर्व जबाबदारी स्वतःवर पेलण्याची जबाबदारी आमच्यावर आली. अपरिहार्य अशा दडपशाहीमुळे पक्षाचे अस्तित्व मुळी काही काळ अशक्य वाटू लागले होते. उत्साही कॉम्रेड्स नव्हे तर नेतेच आमची हेटाळनी करू लागले. एखाद्या दिवशी आमच्या स्वतःच्या कार्यक्रमाच्या व्यर्थतेची मलासुद्धा खात्री पटणार कि काय अशी भीती मला काही काळ वाटायची. ती वेळ म्हणजे माझ्या क्रांतिकारक आयुष्यातला निर्णायक क्षण होता, महत्वाचे वळण होते. 'अभ्यास कर' अशी हक माझ्या मनाच्या कानाकोपऱ्यात निनादू लागली : प्रतीस्पर्ध्यांनी उपस्थित केलेल्या चर्चेला तोंड देता येणे शक्य व्हावे म्हणून अभ्यास कर; तुझ्या निष्ठेच्या बाजूने युक्तिवाद करण्यासाठी भरभक्कम दारुगोळा जमवण्याकरता अभ्यास कर. मी अभ्यासाला सुरुवात केली.

माझ्या सुरुवातीच्या श्रद्धा आणि ठाम मते यात त्यानंतर ठळक बदल झाले. आमच्या आधीच्या लोकांचा फक्त हिंसक कृतींवर भर होता. त्या स्वप्नाळूपणाची जागा आता गंबीर विचारांनी घेतली. गुढवाद आणि आंधळी निष्ठा विरून गेली. वास्तववाद ही आमची निष्ठा बनली. अत्यंत आवश्यक असेल तेव्हाच बळाचा वापर करणे योग्य ठरले व अहिंसा हे लोकचळवळीसाठी अपरिहार्य धोरण ठरले. हे सर्व कार्यपद्धतीविषयी झाले. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या आदर्शांसाठी आम्ही लढत होतो त्याबद्दल आम्हाला स्पष्ट कल्पना आली. त्या काळात प्रत्यक्ष कृतीच्या क्षेत्रात फारसे काम नसल्यामुळे जगातल्या इतर क्रांत्यांमधल्या आदर्शांचा अभ्यास करायला भरपूर वेळ मिळाला. अराजकवादी नेता बकुनीन याच्याबद्दल मी अभ्यास केला; साम्यवादाचा जनक मार्क्स याच्याबद्दल काही वाचले; स्वतःच्या देशात यशस्वीपणे क्रांती घडवणारे लेनिन, ट्राटस्कीव इतर यांच्याबद्दल बरेचसे वाचले. ते सर्व नास्तिक होते. सलग ग्रंथाच्या रुपात लेहिलेले नसले तरी बाकुनिनचे 'GOD AND STATE' (ईश्वर आणि शासनसत्ता) हे पुस्तक म्हणजे या विषयावरचा उद्बोधक अभ्यास आहे. त्यानंतर निर्लंब स्वामींचे 'कॉमन सेन्स' या नावाचे पुस्तक माझ्या पाहण्यात आले. ते पुस्तक फक्त गूढवादी नास्तिकतेच्या प्रकारात मोडणारे आहे. या विषयात मला सर्वात जास्त आस्था वाटू लागली. १९२६ साली शेवटी विश्व निर्माण करणाऱ्या, चालवणाऱ्या व त्याचे नियंत्रण करणाऱ्या सर्वश्रेष्ठ ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांताच्या फोलपणाविषयी माझी खात्री झाली. माझी धार्मिक श्रद्धा मी दूर फेकली. मी याबद्दल उघड बोलू लागलो. माझ्या मित्रांशी या विषयावर चर्चा करायला सुरुवात केली. मी नंबर एक चा नास्तिक बनलो. पण त्या सर्वांचा नेमका अर्थ काय याची चर्चा नंतर करू. 

१९२६ मध्ये मला लाहोर येथे अटक झाली. त्या अटकेने मला आश्चर्याचा धक्का बसला. पोलिस माझ्या मागे आहेत या गोष्टीची मला कल्पना नव्हती. एका बागेतून जाताना अचानकपणे पोलिसांनी घेरल्याचे माझ्या ध्यानात आहे. त्याप्रसंगी मी अत्यंत शांत होतो याचे मला स्वतःलाच आश्चर्य वाटले. कसलेही संवेदना किंवा चलबिचल मला जाणवली नाही. मला पोलिस ठाण्यावर नेण्यात आले. दुसऱ्या दिवशी मला रेल्वे पोलिस कोठडीत नेण्यात आले. इथे मला सबंध महिन्याचा काळ कंठायचा होता. बरेच दिवस पोलिस अधिकाऱ्यांशी झालेल्या बोलण्या-चालण्यावरून मी तर्क केला कि काकोरी पक्षाशी आणि इतर क्रांतिकारक कार्याशी असलेल्या माझ्या संबंधांविषयी त्यांना काही माहीती मिळाली होती. त्यांनी मला सांगितले कि (काकोरी) खटल्याची सुनावणी चालू असताना मी लाहोरमध्ये होतो, त्यांच्या सुटकेसाठी सल्लामसलत करून मी एक योजना आखली होती, त्यांची संमती मिळाल्यावर आम्ही बॉम्ब हस्तगत केले आणि चाचणी घेण्यासाठी १९२६ साली दसऱ्याच्या उत्सवाच्या निमित्ताने जमलेल्या गर्दीत त्यातला एक बॉम्ब फेकला. त्यंनी मला हेसुद्धा सांगितले कि माझ्या भल्यासाठी जर मी क्रांतिकारी पक्षाच्या हालचालींवर प्रकाश टाकणारे काही निवेदन देऊ शकलो तर मला शिक्षा होणार नाही, उलट मला मुक्त केले जाईल आणि कोर्टात माफीचा साक्षीदार म्हणून उभेदेखील न करता सोडून देऊन मला इनाम दिले जाईल.

त्यांच्या या सूचनेला मी हसलो. तो सर्व भंपकपणा होता. आमच्यासारख्या कल्पना बाळगणारी माणसे आपल्याच निष्पाप माणसांवर बॉम्ब फेकत नसतात. एक दिवस सकाळीच त्या वेळचा गुप्तचर खात्यातला प्रमुख वरिष्ठ अधिकारी न्यूमन माझ्याकडे आला. बऱ्याच सहानुभूतीपूर्वक (त्याच्या दृष्टीने) बोलण्यानंतर एक अत्यंत दुखद अशी बातमी मला सांगीतली, 'मी जर त्यांनी मागितल्या प्रमाणे निवेदन दिले नाही तर काकोरी प्रकरणात बादशहाविरुद्ध युद्ध चालवण्याच्या कटाबद्दल आणि दुसऱ्या बॉम्बस्फोटातल्या  निघृण हत्येबद्दल माझ्यावर खटला भरणे त्यांना भाग पडेल.' त्याने मला आणखी असेही सांगितले कि पुन्हा शाबित करून मला फाशी देण्याइतपत पुरावा त्यांच्यापाशी आहे मी जरी निरपराध होतो तरी मला खात्री होती कि मनात आणले तर पोलीस त्यांना हवे ते करू शकत होते. 

पुढचा भाग लवकरच......


Saturday, February 7, 2015

मी नास्तिक का आहे? -भगतसिंग part 1 of 6

एक नवीनच प्रश्न उभा  राहिला आहे : सर्वशक्तिमान, सर्वव्यापी, आणि सर्वज्ञ अशा ईश्वराचे अस्तित्व मी केवळ माझ्या बढाईखोरपणामुळे नाकारतो आहे का? ह्या प्रश्नाला तोंड द्यावे लागेल अशी मला कधीही कल्पना नव्हती. पण मी मित्रांशी बोलताना माझ्या असे लक्ष्यात आले की ह्या माझ्या मित्रांना- मी तरी त्यांना मित्र मानतो - माझा जो काही थोडासा सहवास मिळाला त्यावरून त्यांनी जवळपास असा निष्कर्ष काढला आहे कि देवावरचा अविश्यास हा माझा जरा अतिरेकीपनाच आहे आणि माझ्या नास्तिक असण्यामागे बराचसा उथळपणा व दाखवेगिरी एवढीच कारणे आहेत. एकूण ही समस्या तशी गंभीर आहे. मनुष्य स्वभावातल्या या दोषास्पद प्रव्रतींपासून मी पूर्णपणे मुक्त आहे अशी बढाई मी मारत नाही. मी माणूस आहे. बस्स, याहून जास्त काही नाही. तसला काही दावाही मी करत नाही आणि कोणीही असा दावा करू शकत नाही. माझ्यातही ही उणीव आहे.

पोकळ ऐट हा माझ्या स्वभावाचा एक भाग निश्चितच आहे. माझ्या सहकार्यांत मी एकाधिकारशहा म्हणूनच ओळखला जात होतो. माझे स्नेही बी.के.दत्त हेसुद्धा कधी कधी मला तसे म्हणत. काही प्रसंगी तर जुलमी सत्ताधीश म्हणूनही माझी संभावना केली जायची. काही मित्र गंभीरपणे तक्रार करतात कि मी माझ्या नकळत माझी मते दुसर्यांवर लादतो व माझे निर्णय मान्य करून घेतो. त्यात काही अंशी तथ्य आहे हे मी नाकारत नाही. हे सर्व म्हणजे कदाचित अहंमान्यता असेल. इतर लोकप्रिय मतप्रवाहांच्या तुलनेने आपला पंथ जितका व जसा वेगळा आहे  तितक्या प्रमाणात माझ्यात गर्विष्ठपणा आहे. पण तो वैयक्तिक स्वरूपाचा नाही. कदाचित तो आपल्या श्रध्येविषयीचा योग्य अभिमान असेल पण त्यला गर्विष्ठपणा म्हणता येणार नाही. ऐट किंवा अगदी काटेकोरपणे सांगायचे झाले तर 'अहंकार' हा स्वतःबद्दलच्या गैरवाजवी अभिमानाच अतिरेक असतो. या गैरवाजवी अभिमानामुळे मी नास्तिकतेकडे वळलो आहे की या विषयाचा काळजीपूर्वक अभ्यास व बरेचसे चिंतन केल्यानंतर मी देवावरच्या अश्रध्ये पर्यंत आलो आहे या प्रश्नाची मी येथे चर्चा करू इच्छितो. सर्वप्रथम मला हे स्पष्ट करावेसे वाटते कि अहंमन्यता आणि पोकळ ऐट या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.  

पहिली गोष्ट म्हणजे गैरवाजवी अभिमान किंवा फुकटचा गर्विष्ठपणा ह्या गोष्टी देवावर विश्वास ठेवण्याच्या माणसाच्या वाटेवर  अडथला होऊच कश्या शकतात हे मला खरोखरच उमजत नाही. लायकी नसूनही, किंवा त्यासाठी खरे म्हणजे मुलभूतरित्या आवश्यक असणारे गुण अंगी नसूनही, जर मला काही प्रमाणात  प्रसिद्धी मिळालेली असेल तर एखाद्या खरया थोर माणसाची थोरवी मी नाकारू शकतो, एवढे समजण्या सारखे आहे. परंतु देवावर विस्वास ठेवणारा मनुष्य त्याच्या अंगच्या दाखविगिरीमुळे असा विश्वास ठेवणे कसे थांबवू शकतो? हे दोनच प्रकारे होऊ शकते. त्या माणसाने स्वतःलाच ईश्वराचा प्रतिस्पर्धी म्हणून समजायला सुरुवात केली किंवा तो स्वतःलाच ईश्वर समजू लागला तर. पण दोन्ही प्रकरणी तो खराखुरा नास्तिक होऊ शकत नाही. पहिल्या प्रकारात तो प्रतिस्पर्ध्याचे अस्तित्व नाकारत देखील नसतो. दुसर्या प्रकारातही निसर्गातल्या घडामोडींचे नियंत्रण करणारे, पडद्यामागचे एक चैतन्यास्वरूपी अस्तिव तो मान्य करतोच. तो स्वतःला ही श्रेष्ठ शक्ती समजतो कि अशी शक्ती स्वतःपेक्ष्या वेगळी कुणी दुसरी आहे असे मानतो हे आपल्या दृष्टीने महत्वाचे नाही. मुळ प्रवर्ति त्यात आहेच. त्यचा अंधविश्वास आहेच. तो कोणत्याही प्रकारे नास्तिक नाही. आता माझेच घ्या. मी यापैकी पहिल्या प्रकारातही मोडत नाही किंवा दुसर्या प्रकारातही नाही. सर्वश्रेष्ठ ईश्वराचे अस्तित्व मी मुळात नकर्तिओ. मी ते का नाकारतो हे नंतर बघू. येथे मला ह्या गोष्टीचे स्पष्टीकरण द्यायचे आहे की नास्तिकतेची शिकवण अंगीकारण्यास पोकळ गर्विष्ठापणाने मला उद्यूत केलेले नाही. मी स्वतःच ती सर्वश्रेष्ठ शक्ती किंवा तिचा प्रतिस्पर्धी व अवतार नाही. एक गोष्ट आता निश्चित आहे की अशा प्रकारच्या विचारसरणीकडे मी वळण्यास स्वतःचा बडेजाव कारणीभूत नाही.  

हा आरोप खोटा आहे हे शाबित करण्यासाठी आपण वस्तुस्तिथी पडताळून पाहू. या माझ्या मित्रांच्या म्हणण्यानुसार दिल्ली बॉम्ब प्रकरण व लाहोर कट या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी मला मिळाल्याल्या अवाजवी प्रसिद्धीमुळे कदाचित मी गर्विष्ठ झालो आहे. त्यांचे म्हणे बरोबर आहे का ते आपण पाहूया. माझ्या नास्तिकतेचा उगम इतक्या अलीकडचा नाही. माझ्या या वरील मित्रांना ज्याच्या अस्तित्वाची जाणीवही नव्हती असा एक अप्रसिद्ध तरुण मी होतो तेव्हापासून मी देवावर विश्वास ठेवणे थांबविले होते. नास्तिकतेकडे वळवू शकेल असा कोणताही स्वतःबद्दलचा गैरवाजवी अभिमान निदान महाविद्यालयातल्या एका विद्यार्थ्यात निर्माण होण्याचे काहीच कारण नव्हते. काही प्रोफेसरांचा मी आवडता आणि इतरांचा नावडता होतो, तरी मी कधी अभ्यासु किंवा चमकणारा मुलगा नव्हतो. ज्याला ऐट म्हणतात अशा प्रकारची भावना निर्माण संधी मला कधीच मिळाली नाही. किंबहुना ज्याच्यात पुढील व्यवहारातल्या आयुष्याक्रमाबाबत एक प्रकारचा निराशावाद होता, अशा शामळू व बुजर्या वृतीचा मी मुलगा होतो आणि त्या काळात मी संपूर्णपणे मी नास्तिक नव्हतो. ज्यांच्या देखरेखीखाली मी वाढलो ते माझे आजोबा कर्मठ आर्यसमाजी होते. आर्यसमाजी हा बाकी काहीही असो पण तो नास्तिक नसतो. माझे प्राथमिक शिक्षण संपल्यानंतर मी लाहोरच्या डी. ए. व्ही. शाळेत गेलो आणि एक वर्ष मी तिथल्या वस्तीगृहात मी राहिलो. तिथे सकाळ संध्याकाळच्या प्रार्थनेव्यातिरिक्त मी तासनतास गायत्री मंत्र पठण करीत असे. त्या काळात मी पूर्णपणे श्रद्धाळू होतो. नंतर मी माझ्या वडिलांसोबत राहू लागलो. कर्मठ धर्ममताच्या बाबतीत पाहिले तर ते उदारमतवादी आहेत. स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचण्याची स्पुर्ती मला त्यांच्या शिकवनीतुनच मिळाली. पण ते नास्तिक नाहीत. ते कट्टर आस्तिक आहेत. ओज प्रार्थना म्हणण्यास ते मला प्रोत्साहन देत असत. अश्या प्रकारे मी लहानाचा मोठा झालो. असहकाराच्या दिवसात मी न्याशनल कॉलेजात जाऊ लागलो. उदारमतवादाला अनुसरून विचार करणे, देव किंवा धार्मिक प्रश्नाबाबत चर्चा करणे व त्यांच्यावर टीका करणे हे मी तेथेच सुरु केले. पण तरीही मी श्रद्धावान आस्तिक होतो. त्या वेळेपावेतो मी केस न कापता ते लांब राखण्यास सुरुवात केली होती, परंतु पौराणिक गोष्टी  किंवा शीख व इतर कोणत्याही धर्माच्या शिकवणुकीवर माझा कधी विश्वास बसला नव्हता. पण देवाच्या अस्तित्वावर पक्का विश्वास होता.